646 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदार संघामधून विद्यमान आमदार सरोज अहिरे जनतेच्या मनातील उमेदवार आहेत. त्यांना पुन्हा एकदा येथील जनता जनार्दन निवडून देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी व्यक्त केला.देवळाली विधानसभा मतदार संघामधील विकास कामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते नुकताच पार पडला. त्यावेळी पवार यांनी वरील सूचक विधान करून अहिरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
पवार यांच्या हस्ते राज्य महामार्ग ३७ दहावा मैल, सय्यद पिंपरी ते लाखलगाव, हिंगणवेढे, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, शिंदे या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन आणि शिंदे येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम व देवळाली मतदारसंघातील ३३० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ पार पडला. त्याप्रसंगी ना. पवार बोलत होते. याप्रसंगी मंचावर माजी खासदार देविदास पिंगळे, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, आमदार हिरामण खोसकर, आमदार माणिकराव कोकाटे,आमदार दिलीप बनकर,सरपंच भाऊसाहेब ढिकले,तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, निवृत्ती अरिंगळे,विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे,यशवंत ढिकले यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन सीमा पेठेकर आभार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यशवंत ढिकले यांनी मानले.

आमदार आहिरे यांच्याकडून
विकास कामांचा लेखाजोखा
आमदार सरोज आहिरे यांनी सांगितले कि, देवळाली मतदार संघातील विजेचा प्रश्न मार्गी लावला असून अनेक गावांमध्ये लोडशेडिंगचा होणारा त्रास कमी करण्यासाठी पवार यांना साकडे घातले. त्यापाठोपाठ काही गावांमध्ये स्मशानभूमीचा प्रश्न बिकट होता. तेथेही स्मशानभूमी मंजूर केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रं. ५० चा.प्रश्नही मार्गी लागला. कॅन्टोन्मेंट बोर्डाला देखील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पाच कोटी रुपये निधी उपलब्ध दिला. देवळाली शहर व रस्त्यांचा विकास केला.भगूर येथील सावरकर स्मारकासाठी ४० कोटी रुपये निधी.



