भगवान गौतम बुद्ध यांनी शांततेचा संदेश दिलेला आहे. जगाने गौतम बुद्ध यांचा संदेश पाळला तर युद्ध होणार नाही, वादविवाद तसेच भांडणे होणार नाही, त्यामुळे सर्वांनी गौतम बुद्ध यांच्या शांततेच्या संदेशाचे पालन करायला हवे,असे आवाहन नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी केले
जेलरोड येथील सिद्धार्थ मित्र मंडळ व मनवा महिला मंडळातर्फे मंगळवारी ( दि.२२ ) दसक राजवाडा येथे सायंकाळी गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्ताने युवा गीतकार चेतन लोखंडे यांच्या बुद्ध व भिम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ वाजे बोलत होते. रोहन गांगुर्डे आणि तेजस गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी माजी नगरसेवक संजय भालेराव, माजी नगरसेविका मंगला आढाव, माजी नगरसेवक जगदीश पवार, शिवसेनेचे दिनकर आढाव, कुलदीप आढाव, रोशन आढाव आदी उपस्थित होते. दरम्यान राजाभाऊ वाजे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे खासदार हेमंत गोडसे यांच्या समोर निवडणूक लढवलेली आहे. निवडणुकीचा निकाल ( दि.४ जून ) रोजी लागणार आहे. त्याअगोदरच राजाभाऊ वाजे यांना नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक कार्यक्रमांचे निमंत्रण मिळत असून वाजे देखील सार्वजनिक कार्यक्रमाना आवर्जून हजेरी लावत असल्याने राजकिय वर्तुळात राजभाऊ वाजे चर्चेचा विषय ठरू लागले आहे.



