येथील भारत प्रतिभूती आणि चलार्थपत्र मुद्रणालयात मयत कामगारांच्या ४९ वारसांना शुक्रवारी ( दि. ४ ) प्रेसमध्ये नोकरी देण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्यासह पदाधिका-यांचा पाठपुरावा सुरू होता. यावेळी पेढे वाटून, फटाके फोडून आनंद व्यक्त केला. नोकरीमुळे मयत प्रेस कामगारांच्या नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यासंदर्भात बोलतांना जगदीश गोडसे म्हणाले की, आयएसपी प्रेसमध्ये २९ आणि करन्सी नोट प्रेसमध्ये २० वारसांना कामावर घेण्यात आले. प्रेस मजदूर संघाच्या प्रयत्नामुळे आतापर्यंत १८७ वारसांना कामावर घेण्यात आले आहे. आणखी १७० वारसांना लवकरच न्याय मिळून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जून १९९६ ते जानेवारी २०१३ पर्यंत वारसा भरती झालेली नव्हती. फेब्रुवारी २०१३ पासून ही भरती प्रेस मजदूर संघाच्या प्रयत्नांमुळे सुरू झाली. नवी दिल्लीतील प्रेस महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विजय रंजनसिंग, संचालक (मनुष्यबळ) एस. के. सिन्हा, मुख्य महाव्यवस्थापक विजय गुप्ता, व्यवस्थापक अतुल तोमर, आयएसपीचे महाव्यवस्थापक राजेश बन्सल, नोट प्रेसचे डॉ. डी. के रथ यांच्या सहका-यामुळे वारसा भरतीला चालना मिळाली. सध्या दोन्ही प्रेसमध्ये अधिकारी व कर्मचारी मिळून २८०० जण कामावर आहेत. मजदूर संघामुळे या सर्वांना वेळेवर बढती, वेतन, इतर भत्त, मेडिकेल्म व अन्य सुविधा मिळत आहेत.पत्रकार परिषदे वेळी कामगार नेते राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, कामगार पॅनलचे अध्यक्ष राजाभाऊ जगताप, प्रवीण बनसोडे, अशोक पेखळे, संतोष कटाळे, योगेश कुलवधे, अविनाश देवरूखकर, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे आदी उपस्थित होते.
वारसाच्या भरतीत मला नोकरी
मी देखील वारस भरतीतूनच प्रेसमध्ये कामावर लागलो आहे. त्यामुळे प्रेस कामगारांच्या अकाली मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाची काय ओढाताण होते ते जवळून पाहिले आहे. त्यामुळे वारसा भरतीव्दारे न्याय दिल्याचे मोठे समाधान मिळत आहे. अशी प्रतिक्रिया प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली.