596 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विश्वास ठेवत ,सतत तीस वर्षे निवडून दिले. ते उगीच नाही, मतदार संघात विकासासोबतच आम्ही सामाजिक सलोखा साधण्यावर भर दिला. ताण तणाव निर्माण होईल किंवा संवेदनशील परिस्थिती निर्माण होईल, अशी भूमिका कधीच स्वीकारलेली नाही. किंवा सत्तेचा दुरुपयोग केलेला नाही. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही सतत प्रामाणिक प्रयत्न केले. त्याची परतफेड म्हणून मतदारांनी देवळालीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्हाला सलग तीस वर्ष राज्याच्या विधानसभेत संधी दिली. त्याचा आम्ही कधीच बडेजाव केला नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बबनराव घोलप यांनी दिली.
माजी मंत्री बबनराव घोलप पुढे म्हणाले की, तीस वर्षे आम्ही देवळाली मतदारसंघाचे राज्याच्या विधानसभेत प्रतिनिधित्व केले. त्यावेळेस ठराविक पाच वर्षाचा अपवाद वगळला तर पंचविस वर्षे आम्ही विरोधी पक्षात होतो. आजकाल सत्ताधाऱ्यांना लवकर निधी मिळत नाही, तेव्हा विरोधी पक्षाच्या आमदारांना कसा काय अतिरिक्त निधी मिळेल, अशी परिस्थिती होती. परंतु तरीही शेवगे दारणा येथील पूल आम्ही त्यावेळेस निर्माण केला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास कामे केली. आजही विकास कामे आपल्याला उभी असलेली दिसतात. आम्ही तीस वर्षात केलेल्या कामाचे कधीही राजकीय भांडवल केले नाही. परंतु तीस वर्षात कामे झाली नाही, ती मी केवळ पाच वर्षात केली. असा कांगावा करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला देवळालीचा सुज्ञ मतदार अजिबात बळी पडणार नाही, असा विश्वास माजी मंत्री बबनराव घोलप यांनी व्यक्त केला.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय

महाविकास आघाडीची लाट
लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्रात यावेळेस विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीची लाट आहे. राज्यात सत्ता परिवर्तन नक्की होणार आहे. त्यामुळे देवळाली विधानसभा मतदारसंघातील मतदार परिवर्तन घडवून आणतील, आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश घोलप यांना जनता देवळालीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्याच्या विधानसभेत पाठवतील, यात मला कोणत्याही प्रकारची शंका वाटत नाही अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बबनराव घोलप यांनी दिली.



