नियमांचा भंग केल्याबद्दल रिझर्व्ह बॅंकेने दंड केल्याने अनेक मोठ्या बॅंकांना एफएसडब्लूएम (फायनान्शियली साऊन्ड अॅन्ड वेल मॅनेज्ड) गटात राहणे जमले नाही, ते नाशिक रोड देवळाली व्यापारी बॅँकेने करून दाखवले आहे. सभासदांचा असणारा विश्वास सहकारी बॅंकांची मोठी संपत्ती आहे. जोपर्यंत हा विश्वास आहे, तो पर्यंत या बॅंकांनी चिंता करण्याचे कारण नाही असे प्रतिपादन सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. उदय जोशी यांनी केले.
सहकार भारतीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. जोशी यांचा नाशिक रोड देवळाली व्यापारी बॅंकेतर्फे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी सत्कार केला. त्या वेळी ते बोलत होते. राज्य अर्बन को. ऑपरेटिव्ह फेडेरशनचे अध्यक्ष अजय बम्हेचा, व्यापारी बॅंकेचे जेष्ठ संचालक निवृत्ती आरिंगळे, उपाध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा, संचालक मनोहर कोरडे, रामदास सदाफुले, राम गायकवाड, नितीन खोले, योगेश नागरे, अरुण जाधव, मुख्य कार्यकारी् अधिकारी राजेंद्र सोनार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. जोशी म्हणाले की, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांना सहकार क्षेत्राचे चांगले ज्ञान आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकांसाठी जाचक नियम राबवले जातात. त्यामुळे खासगीसह सर्वच बॅंका वैतागल्या आहेत. अमित शहा यांनी आता रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकांना अधिक दंड नको (नो मोर फाईन), बॅंका बंद करू नये (नो मोर क्लोजर) यासाठी उपाय योजना सुरू केल्या आहेत. देशातील आघाडीच्या चाळीस पतसंस्था निवडून त्यांना सहकारी बॅंका म्हणून परवाना देण्याचे ठरवले आहे.
बॅंकांच्या भवितव्य उज्वल होण्यासाठी केंद्र सरकार पाऊले उचलत आहे. अर्बन बॅँकांच्या भवितव्याबाबत रिझर्व्ह बॅंकेला पूर्वी चिंता वाटायची आता त्यांना या बॅंकांबद्दल मोठी आशा वाटत आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या नियमांची चौकट मोडायची नाही, त्यांचे पालन करायचे, धन दांडग्यांचा प्रभाव सहकार क्षेत्रावर कमी राहिल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.