नाशिकरोड : उमेश देशमुख
प्रभाग २० मधील भाजपचे ज्येष्ठ नेते संभाजी मोरुस्कर यांचा पराभव अनपेक्षित मानला जातो. संभाजी मोरुस्कर म्हणजे विजय आणि विजय म्हणजे संभाजी मोरुस्कर असे जणुकाही समीकरणच रूढ झाले होते. मागील काही निवडणुकीपासून हेच समीकरण गृहीत धरले जात होते. परंतु या निवडणुकीत मोरुस्कर यांच्या विजयी समीकरणाला छेद मिळाला. तो छेद कोणी दिला ?, तर तो म्हणजे कायम पराभव पाहिलेल्या आणि पचविलेल्या कैलास मुद्लियार यांनी. त्यामुळेच मुदलियार यांना खऱ्या अर्थाने वेळ आणि न्यायनितीने विजय मिळवून दिला. अर्थात यामागे त्यांची संयमी भूमिका कारणीभूत ठरते. विजयानंतर त्यांना जायन्ट किलर म्हणून संबोधले जाऊ लागले आहे.

वारंवार होणाऱ्या पराभवाने खचून न जाता शांतपणे आणि संयमाने राजकीय संघर्ष करून आपले अस्तित्व कैलास मुदलियार यांनी टिकवून ठेवले. प्रभागात उभारलेले भव्य प्रति बालाजी मंदिर ही त्यांची खरी ओळख मानली जाते. सुरुवातीला बालाजी मंदिर अतिक्रणामुळे चर्चेत आले. भर रस्त्यावर दीपमाळ उभारल्याने मंदिर वादाचे विषय ठरले. संपूर्ण शहरात तो विषय चर्चेत होता. अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत दीपमाळ जमीनदोस्त करण्यात आली. या घटनेने मुदलियार खचले नाही. उलट अधिक जोमाने कायदेशीररीत्या परवानग्या घेत नव्याने मंदिराची उभारणी केली. या घटनेवरून समस्यात संधी शोधणारे नेतृत्व असे गुणवैशिष्टे कैलास मुदलियार यांचे दिसून आले. विरोधकांनी त्यांच्या प्रतिमेविषयी सतत अपप्रचार करून राजकीय चरित्र मलिन करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचे हित साधण्याचा प्रयत्न कायम केला. यावेळेला विरोधकांची खेळी यशस्वी झालेली नाही. उलट मोठ्या मताधिक्याने कैलास मुदलियार यांना मतदारांनी विजय करून त्यांच्यावर विश्वास दाखविला. त्यांच्या विजयाने भाजपच्या ज्येष्ठ बड्या नेत्याला पराभव पत्करावा लागला. त्यामुळेच कैलास मुदलियार जायन्ट किलर ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
तिरुपती बालाजी भक्ताला पावले !
कैलास मुदलियार आणि त्यांचे कुटुंबिय तिरुपती बालाजीचे निस्सिम भक्त असल्याचे सर्वश्रुत आहे. आजवर नाशिक महापालिकेच्या निवडणुका मुदलियार कुटुंबियाने लढविलेल्या आहेत. त्यांच्या पदरी सतत अपयश मिळाले. पराभव, पराभव आणि पराभव असेच काहीसे समीकरणे होते.पण २०१६ चे नवीन वर्ष मुदलियार कुटुंबाला शुभ ठरले. वर्षाच्या सुरुवातीलाच कैलास मुदलियार यांना महापालिका निवडणुकीत विजय मिळाला. यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबियांवर असणारा पराभवाचा शिक्का पुसला गेला. एकप्रकार मुदलियार कुटुंबियांना भगवान बालाजी पावले. असे बोलले जाते आहे.


