नाशिकरोडच्या मळे शिवारात चार दिवसात दोन बिबटे जेरबंद झाले. वडनेर दुमाला येथे दुसरा बिबट्या जेरबंद झाला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वडनेर दुमालातील साडेतीन वर्षांचा आयुष भगत याला दारातून बिबट्याने उचलून नेऊन त्याचा बळी घेतला होता. यामुळे या परिसरात वन विभागाने तब्बल पंधरा पिंजरे लावले आहेत. त्यातून जयभवानी नगर येथील बाळासाहेब जाधव यांच्या पेरूच्या बागेत लावलेल्या पिंज-यात सोमवारी बिबट्या अडकला. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्यासह नागरिकांनी वन विभाच्या विरोधात मोर्चाद्वारे आंदोलन छेडले होते.
वन अधिकारी सुमित निर्मळ, अनिल अहिरराव, विजयसिंह पाटील, अंबादास जगताप, दर्शन देवरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्यासह पिंजरा ताब्यात घेतला.रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वडनेर दुमालातील साडेतीन वर्षांचा आयुष भगत याला दारातून बिबट्याने उचलून नेऊन त्याचा बळी घेतला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. संतप्त ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधीनी वन विभागाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती.
वन विभागाने या परिसरात बिबट्यांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक साधनांसह पंधरा पिंजरे लावले आहेत. चार दिवसांपूर्वी एक बिबट्या ऊसाच्या शेतात जाळे टाकून व इंजेक्शन देऊन पकडण्यात आला होता. आज दुसरा पकडण्यात आला. मात्र, अजूनही अनेक बिबटे या भागात फिरत असल्याची भिती माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी व्यक्त केली आहे.सोमवारी सकाळी बिबट्या पिंज-यात अडकलेला निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितरीत्या म्हसरूळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्र हलविण्यात आले. या भागात अजून किती बिबटे आहेत आणि हल्लेखोर बिबट्या हाच का, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
वडनेर दुमाला पाठोपाठ आता पिंपळगाव खांब शिवारात मुक्त संचार करणारा बिबट्या पकडण्यात आला. तरीही शेतक-यांनी परिसरात शेतीच्या कामासाठी जाताना सावधगिरी बाळगावी, लहान मुलांना एकटे सोडू नये, रात्री विनाकारण बाहेर पडू नये, अशा सूचना वनाधिकारी सुमित निर्मळ यांनी दिल्या.पिंपळगाव खांब, विहीतगाव, वडनेर, जयभवानी रोड, देवळालीगाव, पाथर्डी, दाढेगाव आदी मळे विभागात सुमारे वीस बिबटे आहेत. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी कार्यक्षमपणे काम करत आहेत. नागरिक वनविभागाला रात्री-अपरात्री मदत करत आहेत. बिबट्यांचा प्रश्न लवकरच निकाली निघेल, अशी आशा माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी व्यक्त केली आहे.