नगरसेवक म्हणून निवडून दिले तर तपोवनातील एकही वृक्ष तोडू देणार नाही ! ; उबाठाचे इच्छुक उमेदवार हेमंत गायकवाड यांचे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर वचनपत्र
नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ मध्ये मतदारांनी मला महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिले तर मी तपोवनातील एकही वृक्ष तोडू नाही, असे वचनपत्र प्रभाग वीस मधील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार हेमंत गायकवाड यांनी वृक्षप्रेमींना शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिले. यामुळे शहरातील तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला दिसतो.
नाशिक मध्ये २०२७ मध्ये पार पडणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने तपोवनात वृक्षतोड मोहीम हाती घेतली होती. परंतु त्याला जागरूक वृक्षप्रेमी आणि नाशिककरांनी तीव्र विरोध दर्शवत आंदोलन छेडले. यात विरोधी राजकीय पक्षांनी देखील सहभाग घेतला. वाढत्या विरोधामुळे शासनाने वृक्षतोडीला तात्पुरती स्थगिती दिली. परंतु या स्थगितीवर उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते तथा बांधकाम व्यावसायिक हेमंत गायकवाड यांचा विश्वास नाही. गायकवाड हे नाशिकरोड परिसरातील प्रभाग वीस मधून उबाठा कडून महापालिकेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.त्यांची उमेदवारी देखील जवळपास निश्चित मानली जाते आहे. त्यांनी सोमवारी ( दि.२९ ) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर लगेचच त्यांनी तपोवन गाठले. वृक्षतोड होऊ नये, यासाठी आंदोलन करणाऱ्या वृक्षप्रेमींची भेट घेतली. त्यांना शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर वचनपत्र लिहून दिले. मतदारांनी मला महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत मला नगरसेवक म्हणून पाठविले तर मी एकही वृक्ष तोडू देणार नाही, असा मजकूर असलेले वचनपत्र त्यांनी स्टॅम्प पेपर वर लिहून दिले.
निवडणुकीत मुद्दा गाजणार !
याविषयी बोलतांना हेमंत गायकवाड म्हणाले की, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांना तपोवनातील वृक्षतोडीबद्दल खडे बोल सुनावले. शिवाय राज्यात हा मुद्दा चर्चेत आहे.सामान्य नाशिकरांना विसर पाडून कदाचित पुन्हा वृक्षतोडीची मोहीम शासन राबवू शकते. निवडणुकीनंतर याविषयी निवडून येणाऱ्या सर्व नगरसेवकांनी महापालिका प्रशासनावर दबाव निर्माण व्हावा, म्हणून मी शभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर वचनपत्र लिहून दिले. महापालिका निवडणुकीत देखील या विषयावर संबंधितांना जाब विचारणार आहोत.