येथील विद्यार्थी प्रिय शिक्षिका प्रा. जयश्री जाधव – कदम यांनी पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विषयात पदवी मिळविली. वयाच्या ५५ व्या वर्षी ही पदवी त्यांनी प्राप्त केली. मविप्र समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
मागील २२ वर्षापासून वरिष्ठ महाविद्यालयात त्यांचे अध्यापन सुरु आहे. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पीएच.डी पदवी संशोधक मार्गदर्शक असून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याने त्यांनी पीएच. डी पदवी प्राप्त केली आहे. अनेकांनी पेटंट प्राप्त केले आहेत. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रम समितीचे सदस्य आहेत. त्यांनी महाविद्यालयाच्या विविध समित्यांमध्ये जबाबदारीने काम पूर्ण केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणे त्यांना आवडते.
सांस्कृतिक विभागात यश
सांस्कृतिक समिती प्रमुख म्हणून काम करताना महाविद्यालयाला आतापर्यंत अनेक बक्षिसे प्राप्त करून दिली आहेत. आतापर्यंत विविध स्वरूपाचे एकूण ०८ पुरस्कार प्राप्त केले आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात त्या नेहमी पुढाकार घेतात. २०२२-२३ मध्ये दिल्ली येथे पार्लमेंट मध्ये प्रत्यक्ष बजेट सादर होते. त्यासाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सहलीचे आयोजन त्यांनी केले होते. २०२४-२५ मध्ये भारतीय रिझर्व बँक मुंबई येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. अनेक महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर त्या मार्गदर्शन करतात.
महिला सबलीकरणावर भर
महिला दिनानिमित्ताने खास करून महिला सबलीकरणावर मार्गदर्शन करतात. बचत गटांनाही त्या मार्गदर्शन करतात. आत्तापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ४० पेक्षा अधिक संशोधन पेपर वाचन आणि प्रकाशित झाले आहेत. महाविद्यालयामध्ये दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत त्या करतात. विविध वृत्तपत्रांमध्ये २५० पेक्षा अधिक लेख प्रसिद्ध झाले असून अर्थशास्त्रातील पुस्तक व संदर्भ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. नोकरी करत असतांना त्यांनी हे यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.