नाशिकरोड : उमेश देशमुख
महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्या विद्युत क्षेत्रातील गेल्या ३७ वर्षांच्या योगदानाची दखल घेत ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’ (भारत) संस्थेच्या वतीने त्यांना ‘एमिनेंट इंजिनियर’ हा देशपातळीवरील मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
अमरावती येथे येत्या २१ व २२ ऑगस्टला आयोजित ‘आयईआय’च्या ४१ व्या राष्ट्रीय विद्युत अभियंता अधिवेशनामध्ये संचालक श्री. राजेंद्र पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या दोन दिवसीय अधिवेशनात ‘विकसित भारताचे ध्येय: एआय आणि हरित तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा क्षेत्राचा कायापालट’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. देशाच्या तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व सर्वात मोठी व्यावसायिक संस्था असलेल्या ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडिया’ची स्थापना १९२० मध्ये झाली आहे. कोलकाता मुख्यालय असलेल्या या संस्थेचे देशभरात १२५ पेक्षा अधिक स्थानिक केंद्र आहेत.

श्री. राजेंद्र पवार यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता ते मुख्य अभियंता पदापर्यंत काम केले आहे. या ३६ वर्षांच्या कालावधीत प्रामुख्याने ग्रामीण भागातील दऱ्याखोऱ्यांसह घरगुती, शेती, व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रात नवीन वीजयंत्रणा उभारणे, नवीन वीजजोडण्या आणि सुरळीत वीजपुरवठ्यासाठी उल्लेखनीय कामे केली आहेत. एप्रिल २०२५ पासून श्री. पवार महावितरणचे संचालक (मानव संसाधन) म्हणून कार्यरत आहे. विद्युत क्षेत्रात श्री. राजेंद्र पवार यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना आयईआय संस्थेकडून हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.